.... आणि एकलव्याने आपला अंगठा कापून द्रोणाचार्यांच्या पायावर ठेवला. गोष्टीतलं शेवटचं वाक्यही संपलं.
खरंतर आतापर्यंत त्यानं झोपायला पाहिजे. एरवी गोष्ट संपण्याच्या आतच तो झोपतो. पण आज तो लक्षपूर्वक ऐकत होता. मी थांबलेलो पाहताच तो उठून बसला आणि विचारलं, “तातू, द्रोणाचार्यांनी चीटींग केली ना ? मग ते सगळ्यात चांगले टीचर कसे ?”
मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. कशीबशी त्याची समजूत काढत म्हणालो, “अरे त्यांची काहीतरी मजबुरी होती ना. “
पण त्याला ते पटलं नाही. तो पुन्हा म्हणाला, “पण एकलव्याने अंगठा कापला तेंव्हा त्याला किती दुखलं असेल, रक्तपण आलं असेल ना. काल माझ्या मित्राला एकदा खेळताना लागलं होतं तर सगळे टीचर पळत आलेले . द्रोणाचार्यांनी एकलव्याच्या जखमेवर औषध पण लावलं नाही.”
पण त्याला ते पटलं नाही. तो पुन्हा म्हणाला, “पण एकलव्याने अंगठा कापला तेंव्हा त्याला किती दुखलं असेल, रक्तपण आलं असेल ना. काल माझ्या मित्राला एकदा खेळताना लागलं होतं तर सगळे टीचर पळत आलेले . द्रोणाचार्यांनी एकलव्याच्या जखमेवर औषध पण लावलं नाही.”
“हं, तसं झालं खरं. “
“आणि तातू, अर्जुन तर राजकुमार होता ना ?”
“होय”
“आणि एकलव्य शिकाऱ्याचा मुलगा ?”
“होय.”
“मग तर द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा घ्यायलाच नको होता. त्याला धनुष्य-बाण कसं चालवता येईल ?”
“अरे, पण त्यानं नंतर प्रॅक्टीस केलीच ना.”
असं होय. त्याचं समाधान झालेलं दिसलं.
झोप रे आता. सकाळी शाळेत जायचंय ? मी थोडा आवाज चढवला तसा तो पुन्हा माझ्या कुशीत शिरला. डोळ्यावर झोप चढली, तशा अर्धवट झोपेतही तो पुन्हा म्हणाला, “तातू एकलव्याला दवाखान्यात घेऊन जायचं का हो आपण ? “